वाचक लिहितात   

हे महिला सशक्तीकरण नव्हे!

मोदी सरकारला अकरा वर्षे पूर्ण झाली आहेत. त्याच्या पूर्वसंध्येला एक्स समाजमाध्यमावर लिहिलेल्या संदेशात पंतप्रधानांनी विविध योजनांवर प्रकाशझोत टाकला. त्यात विकासासाठी महिला सशक्तीकरण महत्वाचे असल्याचे पंतप्रधानांनी प्रतिपादन केले. गेल्या ११ वर्षांमध्ये आपल्या सरकारने महिला केंद्रित विकासाला महत्त्व दिले असून, सर्व क्षेत्रांमध्ये देशातील महिला चांगली कामगिरी करून इतरांना प्रेरणा देत आहेत. एकीकडे महिला स्वकर्तृत्वावर, हिंमतीवर आपल्या क्षेत्रात चोख कामगिरी बजावत आहेत, तर दुसरीकडे ज्यांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे, त्यांना खरी व्यवसाय अथवा छोट्या धंद्यासाठी आर्थिक मदत करणे गरजेचे होते; परंतु महाराष्ट्र सरकारने स्वतःच्या स्वार्थ आणि मतलबासाठी सर्व महिलांना सरसकट रू १५०० देऊन निवडणुका जिंकल्या. महिला सशक्तीकरण करणे महत्वाचे असे म्हणायचे; पण त्यांच्या सुरक्षिततेचे काय? सरकार स्त्रियांना साधी सुरक्षाही देऊ शकत नसेल, तर स्त्रियांनी निर्भयपणे समाजात हिंडायचे कसे? वाढती महागाई, पेट्रोल, डिझेलचे न परवडणारे दर, वाढती बेरोजगारी, कर्जबाजारी शेतकर्‍यांच्या होणार्‍या आत्महत्या, यात सरकारचे अपयशच दिसून येते.

गुरुनाथ मराठे, बोरिवली (पूर्व) मुंबई.

मैत्रीत दुरावा

डोनाल्ड ट्रम्प आणि एलॉन मस्क यांची मैत्री सर्वश्रुत आहे. दोघेही जगातील प्रभावशाली व्यक्ती. एक शक्तिशाली राजकारणी, तर दुसरा सर्वाधिक धनाढ्य; मात्र दोघांमध्येही मतभेद सुरू झाले आहेत. त्याचे रूपांतर शाब्दिक युद्धात सुरू आहे. टेस्ला व स्पेसएक्सचे सर्वेसर्वा इलॉन मस्क यांच्या कंपन्यांशी असलेल्या करारांत कपात करण्याची घोषणा ट्रम्प यांनी केली. यावर अंतराळवीरांची, तसेच इतर साहित्याची आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर ने-आण करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या ‘ड्रॅगन कॅप्सूल’ची सेवाच बंद करण्याची धमकी मस्क यांनी दिली आहे. इलॉन मस्क यांचे सरकारी कार्यक्षमता खाते (डोज) सरकारी खर्चात कपात करण्यासाठी प्राधान्याने निर्माण केले गेले. ट्रम्प यांच्या धोरणाने या खात्याच्या मूळ उद्दिष्टालाच धक्का पोहोचतो, अशी मस्क यांची धारणा आहे. इलॉन मस्क यांनी व्यावसायिक दृष्टिकोन किंवा उद्दिष्ट समोर ठेवूनच ट्रम्प यांना निवडणुकीत मदत केली; परंतु ट्रम्प यांचे नवीन विधेयक मस्क यांच्या टेस्ला कंपनीला अडचणीचे ठरणार आहे. म्हणूनच इलॉन मस्क हे सरकारमधून बाहेर पडले आहे.

दत्तप्रसाद शिरोडकर, मुंबई 

नगदी पिकांचे नुकसान

यंदा आकस्मिक आणि अनपेक्षितपणे आलेल्या अवकाळीने चांगलाच धुमाकूळ घातल्याने बळीराजाची चांगलीच त्रेधातिरपीट उडाली! भाजीपाल्यासह चार पैसे मिळवून देणार्‍या नगदी पिकांचे नुकसानही झाले. मान्सूनपूर्व शेतीच्या मशागतीला हा पाऊस पूरक असला तरी त्याचे मशागतीचे वेळापत्रक मात्र कोलमडले. पेरणीसाठी आणि पेरणीपूर्व मशागतीसाठी औतकाठीची जुळवाजुळव यासाठी आता काहीशा तारांबळीनेच त्याची लगबग सुरू झाली आहे. काळ्या मातीत बीज पेरावे, ते छान अंकुरावे, छान हिरवेगार शिवार फुलून कणग्या, कोठारे, गोदामे भरून वाहणारी धनधान्याची समृद्धी यावी यासाठीच तर त्याची लगबग सुरू आहे!

श्रीकांत जाधव, अतीत (सातारा)

स्कूलबस सुरक्षानियम पाळावेत

लवकरच नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होत आहे. सद्याच्या घडीला मुंबईत अंदाजे सहा हजार, तर उर्वरीत महाराष्ट्रात अंदाजे ३५ हजार अधिकृत स्कूलबस विद्यार्थ्यांची वाहतूक करतात. अशा परिस्थितीत स्कूलबसमधून शाळेत येणार्‍या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी राज्य शासनाच्या शिक्षण विभागाने स्कूलबस चालकांसाठी कडक नियम जाहीर केले असून त्यानुसार बसचालक, त्याचा सहायक आणि महिला सेविकांची सकाळी आणि सायंकाळी अशा दोन्ही वेळेस मादक पदार्थांचे सेवन व मद्यपानाची चाचणी केली जाणार आहे. खाजगी स्कूलबसमधून आपल्या मुलांना शाळेत पाठवणार्‍या पालकांना बसचालकाची संपूर्ण माहिती शाळा व्यवस्थापनाला द्यावी लागणार आहे. अशा बसचालकांची सर्वंकष चौकशी शाळा व्यवस्थापनाला करावी लागणार आहे. बसमध्ये जीपीएस आणि सीसीटीव्ही यंत्रणा अनिवार्य असून दर सहा महिन्यांनी ती अद्ययावत करणे बंधनकारक असेल. बसमध्ये आसन क्षमतेनुसार विद्यार्थ्यांची संख्या असणे, शाळेतील शौचालये परिसरावर देखरेख ठेवणे असेही इतर काही नियम आहेत. स्कूलबसच्या या सुरक्षाविषयक नियमांची अंमलबजावणी काटेकोरपणे व्हावी.

प्रदीप मोरे, अंधेरी (पूर्व), मुंबई

 

Related Articles